निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘घणाघात’, म्हणले…

पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचार्‍यांना जखमी केले. या घटनेवरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे, असा टोला राणे यांनी लगावला आहे. तसेच पोलिसांनी किती सहन करायचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अमिरनगर-प्रकाश नगर येथे धार्मिक स्थळाजवळ पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन निलेश राणे यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दात टिका केली आहे. यासंदर्भात राणे यांनी ट्वीट करीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावे??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमे लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे होत आहे.

औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणार्‍या अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोक धार्मिक स्थळी जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थली दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जखमी झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांना अटक केली.