Coronavirus : … तर राज्यात ‘ही’ वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध व्हा, अजित पवारांनी दिला ‘इशारा’

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाईन –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला इशारा देत म्हटले कि अमेरिकेने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची दररोज वाढत असलेली संख्या गंभीर आहे. नागरिकांनी गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी. महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी वेळीच सावध व्हायला हवे.

ते म्हणाले की, देशातील पहिले कोरोना बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहे त्याचा आनंद आहे. तसेच त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभारही मानले.

त्यांनी आवाहन करत संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू असल्याचे म्हटले. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कोणतीही टंचाई नसून सरकार पुरवठा सर्वकाळ नियमित ठेवेल. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये आणि खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा ठेवावी.

तसेच अत्यावश्यक गोष्टींची गरज नसेल तर घराबाहेर पडल्यावर पोलीस कारवाई करतील. पण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. असेही त्यांनी सांगितले. तर जीवनावश्यक वस्तूंचा साथ आणि मोठ्या भावात विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५ ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या ११२ वर पोहचणं गंभीर असून नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावे, असे ते म्हणाले.