Coronavirus : ‘क्वारंटाइन’मध्ये राहण्यास सांगितलेले 1200 प्रवाशी ‘गायब’ ? मुंबई महापालिकेसमोर ‘आव्हान’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. असे वातावरण असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. 22 मार्च रोजी परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांना महापालिकेने तयार केलेल्या खोल्यांसह घरामध्ये क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना केली होती. मात्र, होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलेल्या प्रवाशांपैकी 1 हजार 200 प्रवासी सध्या कुठे आहेत, याचा पत्ताच महापालिकेला नाही. त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आलेल्या दोन हजार 200 प्रवाशांना शेजार्‍यांपासून होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली होती. होम क्वारंटाइन किंवा महापालिकेच्या खोल्यांमध्ये क्वारंटाइन राहण्याचेही सांगितले होते. मात्र, होम क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना दिलेल्या प्रवाशांपैकी 1200 प्रवासी कुठे आहेत ? याचा शोध महापालिकेचा लागत नाही. त्यांनी फॉर्मवर दिलेला मोबाईल नंबर लागत नाही.

त्यामुळे मुंबई महानगरपालिका हतबल झाली आहे. परदेशातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी करुन प्रवाशांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येत होती. यात ज्यांना करोनासदृश्य लक्षणे होती अशा अ आणि ज्यांना लक्षणं नव्हती पण, करोना होण्याची शक्यता आहे अशा ब गटातील प्रवाशांना महापालिकेच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, 1 हजार 200 प्रवाशांशी संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे.