महाराष्ट्र पुन्हा हादरला, मुंबईत 24 तासांत सर्वात जास्त 97 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. राज्यात आज तब्बल 3 हजार 254 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. मुंबईत आज तब्बल 97 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तर राज्यात आज 149 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 94041 वर पोहचली आहे. मुंबईत आज 1567 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईतील रुग्णांचा आकडा 52 हजार 667 वर पोहचला आहे. राज्यात एकूण 3438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास अडीच महिन्यानंतर मुंबई आणि राज्यातले व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मुंबईत होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लोक अनावश्यक घराबाहेर पडत आहेत, गर्दी करत आहेत तर लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट परत घ्यावी लागेल. म्हणजेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेत. 8 जूनपासून जवळपास सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना घरात राहण्याच आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत नागरिक घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कोरोना विरुद्धच्या लढाईत यश मिळत असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी चार गोष्टी चांगल्या असून ती आकडेवारी बघितली तर दिलासादायक चित्र समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या हवाल्याने आदित्य ठाकरे यांनी काही गोष्टींची आकडेवारी देत परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.