याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संजोय सचदेव लव्ह कमांडो नावाची स्वयंसेवी संस्था चालवतो. ही संस्था घरातल्यांचा विरोध झुगारून प्रेम विवाह केलेल्या आणि करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना तात्पुरता आधार देण्याचे काम करते. यामुळे देशभरात या संस्थेचे नाव आहे. अनेक युगलं या संस्थेच्या आश्रयास येतात. यामुळे संजोयचे नाव प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आमीर खानने त्याला ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात निमंत्रित केले होते. यामुळे संजोयचे नाव घराघरात पोहोचले.
पण संजोयच्या आश्रमात शरण घेतलेल्या जोडप्यांपैकी एका तरुणीने तिथून पळ काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर संजोयचा खरा चेहरा जगासमोर आला. नंतर पोलिसांनी लव्ह कमांडो आश्रमावर धाड टाकली. त्यावेळी तिथे त्यांना तहानभूकेने व्याकुळ झालेली चार जोडपी आढळली. संजोय व त्याच्या साथीदारांनी महिला आयोगाने पाठवलेल्या या जोडप्यांना आश्रमात राहण्यास जागा दिली. पण त्यानंतर या जोडप्यांना रोज मारहाण करण्यात येत होती. त्यांच्याजवळील पैसे व दागिनेही संजोयने लुटले होते. जोडप्याला संजोय बळजबरीने दारू पाजत असल्याचे समोर आले. त्यानंतर या ढोंगी लव्ह कमांडोला अटक करण्यात आली.