औरंगाबादमध्ये लॉकडाउन कालावधीत 52 शाळांच्या प्रांगणात हिरवाईचा ‘बहर’ !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे राज्यातील शाळाही बंद कराव्या लागल्या. पण काही शिक्षकांचे शाळांवरचे प्रेम आणि त्याला शिक्षण विभागाने घातलेले खतपाणी यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 52 शाळांमध्ये जपानी मियावाकी पद्धतीने घनदाट वन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा आवारात नंदनवन बहरले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 115 शाळांमध्ये हा उपक्रम आता राबवण्यात येणार आहे.

शाळांच्या प्रांगणात 36 प्रकारची रोपे लावण्यात आली होती. त्यानंतर अनोख्या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेला 96 हजार 400 रुपयांची तरतूद केली होती. लॉकडाउनमध्ये मियावाकी पद्धतीची वन लागवड करण्यात आली. आता तेथे घनगर्द हिरवे जंगल तरारून आले आहे. काही शिक्षकांनी झाडांना पाणी घातल्याचे देखरेख करणार्‍या कार्यकर्त्यांनी सांगितले होते. उपक्रम यशस्वी व्हावा आणि शिक्षकांच्या पर्यावरण विषयक जाणिवा दृढ व्हाव्यात म्हणून या उपक्रमात सहभागी झाल्याचे ‘इकोसत्व एन्व्हार्यमेंटल सोल्युशन्स’च्या नताशा झरीन म्हणाल्या. प्रत्येक गावात दोन हजार चौरस फूट जागेत 700 झाडे लावण्यात आली आहेत. मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यासाठी त्या भागातील झाडाझुडपांचा शोध घेऊन लागवडीसाठी त्यांची निवड केली जाते. या स्थानिक झाडांची विभागणी झुडूप, उपवृक्ष, झाडे अशा स्तरांमध्ये केली जाते. मातीच्या गुणवत्तेचे आणि तिच्या जीवभाराचे विश्लेषण करण्यात येते. तिची पाणीधारण क्षमता तपासण्यात येते. मातीचे लहान ढिगारे तयार करून अत्यंत दाटीवाटीने लागवड करण्यात येते.