‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकावर निशाणा साधला आहे. तसंच, जेलभरो आंदोलन करणारे वडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या सर्वांना दिवाळीच्या दिवशी कारागृहातच रहावं लागत असल्यानं, यावरून देखील देखील फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबात केलं ट्विट
बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले. बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. तसंच, दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था ! पण मदत द्यायला सरकार तयार नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, लॉकडाउन काळातील वीजबिल माफ करा इत्यादी मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत रोखून धरण्यात आला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.