‘काँग्रेसने 50 वर्ष देशाला एप्रिल फूल बनवलं’

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसने 50 वर्ष देशाला एप्रिल फूल बनवलं आहे. परंतु ही भारताची जनता आहे आणि ती आता एप्रिल फूल बनणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वर्धा येथील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचार सभेत ते बोलत होते. वर्ध्यातील जनतेने काँग्रेसचा सुपडा साफ करून महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वर्ध्यातील पहिल्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तोफ डागत घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “काही देशांमध्ये आज एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो मात्र, 50 वर्षे काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवले आहे. परंतु ही भारतातील जनता आहे. यावेळी ती आता एप्रिल फूल बनणार नाही. असे ते म्हणाले.

‘विदर्भात युतीच्या 10 पैकी 10 जागा येतील, काँग्रेस-राष्ट्रवादीचा होणार सुपडा साफ
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “विदर्भात गेल्या 15 वर्षात जे आघाडी सकारकडून झालं नाही ते आम्ही 4 वर्षात करून दाखवलं. गेले अनेक वर्ष विदर्भावर सुरु असलेला अन्याय मोदींनी दूर केला. विदर्भात यावेळी युतीच्या 10 पैकी 10 जागा निवडणून येणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘काँग्रेस वसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत’
काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न आता नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. आज लोकसभेत, विधानसभेत, जिल्हा परिषदेत एवढचं नाहीतर ग्रामपंचायतीत काँग्रेसला विसर्जित करण्याचं काम भाजपाने केलं आहे.” असे ते म्हणाले. इतकेच नाही तर, “मागील निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांची सभा वर्धा येथूनच झाली होती. वर्ध्याची भूमी महात्मा गांधींची कर्मभूमी आहे.” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिलं.

‘देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते’
काँग्रेस, राष्ट्र्वादी आणि महाआघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने 56 पक्षांना एकत्र आणलं आहे. मात्र देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.