‘तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात, लगेच PM नरेंद्र मोदींशी तुलना करुन घेऊ नका’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मदतीसाठी केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचे काम काय, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
इतक्या गंभीर परिस्थितीत इतका थिल्लरपणा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.
ते येथे राहून घराबाहेर पडत नाही आणि दुसऱ्यांवर टीका करतात…
माध्यमांशी साधलेला संवाद…#ओला_दुष्काळ #MaharashtraRains pic.twitter.com/7x8E7rU6Oa— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 19, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूरमधील नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखला जातात. त्यामुळे तुम्ही लगेच नरेंद्र मोदींची तुलना करुन घेवू नका, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
डिफेंड करण हेच शरद पवारांचं काम
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं शरद पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे, असे फडणवीस म्हणाले.