पालखी सोहळ्याबाबतचा भाविकांनी सहकार्य करावे : गृहमंत्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले. पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

पंढरपूर येथे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. देशमुख म्हणाले, मानाच्या पालख्या 30 जून रोजी पंढरपूर येथे आपापल्या मठात मुक्कामास येतील.

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच, एक जुलै रोजी चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या मठात विसावतील. दोन जुलै रोजी सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल मंदीर येथे दर्शनासाठी येतील. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या आपल्या गावी मार्गस्थ होतील. कोरोनाचे संकट लवकरात-लवकर दूर कर असे साकडे देशमुख यांनी महाव्दार चौकातून श्री विठ्ठल-रुक्मिणीचरणी घातले.