मोदी सरकार गरीबांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! लवकरच महत्त्वाची घोषणा होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशातील कोरोना (Corona) बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी देशातील अर्थव्यवस्था मात्र अद्यापही रुळावर आलेली नाही. कारण कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (LockDown) परिणाम अनेक उद्योगधंद्यावर झाला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना अजूनही पगार कपात सहन करावी लागत आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्ट दिसत आहे. अशात आता मोदी सरकार लवकरच तिसऱ्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत गहू, तांदूळ आणि चणाडाळ दिली जात आहे. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ही योजना सुरू झाली. आधी या योजनेची मर्यादा जूनपर्यंत होती. त्यानंतर ती नोव्हेंबरपर्यंत वाढवली गेली. आता यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरेक्षसाठी राबवण्यात येणारी ही योजना मार्चपर्यंत सुरू राहू शकते.

लॉकडाऊनमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली होती. सरकरानं एकदा या योजनेला मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा एकदा याचा कालवाधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रोत्साहन पॅकेज 3.0 मध्ये मागणी वाढवण्यावर आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपायांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यानं दिल्याचंही या इंग्रजी वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजच्या माध्यमातून सरकार 20 कोटी जन-धन खात्यात आणि 3 कोटी गरीब, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगाच्या खात्यात रोख रक्कम थेट जमा करू शकतं. ही रोख मदतही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा भाग असेल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत काय काय येतं ?
या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्याला 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळतात. या योजनेचा फायदा जवळपास 81 कोटी लोकांना मिळत असल्याचा सरकारचा दावा आहे.

याशिवाय 19.4 कोटी कुटुंबांना दर महिन्याला 1 किलो चणे मोफत दिले जातात.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत या अन्न धान्याचं वाटप करण्यात येत आहे.