Unlock 4 : केंद्र सरकारकडून ‘अनलॉक 4’ ची नियमावली जाहीर, कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन चालूच राहणार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारनं अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दररोज समोर येणार्‍या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं सद्यस्थिती लक्षात घेवुन अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये मेट्रो रेल्वेला 7 सप्टेंबरपासून अटी व शर्थींवर परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं 21 सप्टेंबरपासून सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी केवळ 100 जणच हजर राहू शकतात. दरम्यान, आंतरराज्यीय तसेच आंतरजिल्हा वाहतूकीस कुठल्याही प्रकारच्या ई-पासची गरज नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करण्यात यावं असंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

दरम्यान, इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी शाळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राहणार्‍यांना कुठलीही सुट देण्यात आली नाही.

प्रतिबंधित क्षेत्रामधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.