जळगावात रात्री 10 नंतरही हॉटेल्स उघडी ! पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई

जळगाव : देशात रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ मात्र, जळगाव शहरातील अजिंठा चौक व परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु असल्याचे आढळून येत आहे. शहरात रात्री सर्वत्र नाकाबंदी आणि पोलिसांची गस्त सुरु असते, असे असतानाही ही हॉटेल बिनधास्तपणे सुरु होती.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संयुक्तपणे रात्री दहा वाजल्यानंतर शहरात पाहणी केली. तेव्हा ही बाब समोर आली. अजिंठा चौकात हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्यावरील नारखेडे हॉटेल व कालिंका माता चौकातील श्री गुरु रामदानी फॅमिली रेस्टॉरंट अशी तीन हॉटेल उघडी होती. ग्राहक ये जा करीत होते. ही हॉटेल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पोलीस अधीक्षकांनी तेथील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना तातडीने घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा येथे आला व ही हॉटेल बंद करण्यात आली. हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.