… तर शिवसेना-भाजप ‘युती’ तुटली नसती, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकमेकांच्या हट्टामुळे भाजप-शिवसेनेत असलेली युती तुटली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक फोन उचलला असता आणि जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य हातातून जाऊ दिलं पण एक फोन करुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली नाही. मला त्यांच्या या भूमिकेचे आश्चर्य वाटतं आहे. मात्र त्यांनी हे केलं ते चांगलंच झालं आमचा फायदा झाला असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल भाजप आणि शिवसेनेला होता. कारण महायुतीला 161 जागा मिळाल्या. मात्र, शिवसेनेने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत 50 टक्के वाटा अशा दोन मागण्या केल्या. त्यामुळे काडीमोड झाला.

शिवसेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. राज्यातील सत्तापेच महिनाभर चालला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. या सगळ्या पेचामध्ये शिवसेनाही दोन पावलं मागे आली नाही आणि भाजपाही दोन पावलं मागे आली नाही. त्यामुळे या दोन मित्रपक्षांची युती तुटली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

कदाचित युती तुटली नसती
भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दलची खंत संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जर युतीबाबत चर्चा केली असती एक फोन केला असता तर कदाचित असे घडले नसतं. भाजपच्या नेत्यांशी मला बोलण्याची संधी मिळाली नाही. ती जर मिळाली असती तर कदाचित आणखी वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या असेही संजय राऊत म्हणाले.

Visit : Policenama.com