मुंबईत-ठाण्यासह उपनगरामध्ये पावसाची जोरदार ‘बॅटिंग’

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई, ठाण्यासह उपनगरात काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: धुमशान घातला आहे .रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापुरात पावसाने जोर धरल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता.

उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल मराठवाड्यात आज पाऊस दडी मारणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीतही वादळी-वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीपासून थैमान घातले आहे. पुढचे 3 दिवस दिल्लीत पावसाचा जोर कायम राहिल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

कोरोनाचं संकट असताना मुसळधार पाऊस आणि त्यामुळे रस्त्यांवर साठणारे पाणी अशा दोन्ही परिस्थितीचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर येत्या 24 तासात कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.