‘कोरोना’नं देशातील ‘या’ 6 मेगासिटीचे केले ‘हाल’, एकट्या महाराष्ट्रातील 3 शहरांची अवस्था ‘बेकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मात्र तरी देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे, ठाणे, चेन्नई ही देशातील सर्वात मोठी शहरं आहेत. आज याच मेगासिटींचे कोरोना व्हायरसने हाल झाले आहेत. भारतातील कोरोना व्हायरसच्या एकूण प्रकरणांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं आणि मृत्यू या शहरांमध्ये झाले आहेत. छोट्या छोट्या शहरांच्या तुलनेत या मोठ्या आणि देशाचा गाडा हाकण्यात जास्त हातभार असलेल्या या शहरांची अवस्था अतिशय बेकार झाली आहे.

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 766 आहे. त्यापैकी 82 हजार 974 प्रकरणं ही या सहा शहरांमध्ये आहेत. म्हणजेच जवळपास 54.67 टक्के या शहरात आहेत. तर देशातील एकूण 4337 कोरोना रुग्णांच्या मृत्यूपैकी 2571 मृत्यू म्हणजे 59.58 टक्के मृत्यू या शहरांमध्ये झाले आहेत.

देशातील या 6 शहरांपैकी महाराष्ट्रातील 3 शहरांचा समावेश होतो. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांवर कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेले राज्य आहे. एकूण प्रकरणांपैकी 34.7 टक्के प्रकरणं फक्त महाराष्ट्रातच आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि टेक्सटाईल कॅपिटल अहमदाबाद या शहरांची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे.

या शहरांतील पाच दिवसांचा आलेख पाहिला असता अहमदाबादमधील प्रकरणांचा ग्राफ थोडा स्थिरावला आहे. मात्र मुंबईत तो वेगाने वाढतो आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकरणं मुंबईत आहेत. मुंबईतील धारावी, दादर, माहीम या परिसरामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे मुंबईचा आकडा वाढताना दिसत आहे.

शहरं प्रकरणं    मृत्यू
मुंबई              32791 1065
पुणे                5996 274
ठाणे             6958 93
दिल्ली          15257 303
अहमदाबाद   10841 745
चेन्नई            11131 91