‘इंदिरा गांधींची काळजी ही भाजपमधील बाटग्यांची उठाठेव’, ‘सामना’तून BJP वर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर चांगलेच राजकारण तापायला सुरुवात झाली. राऊत यांनी वक्तव्य परत जरी घेतले असले तरी विरोधात असलेल्या भाजपच्या हातात मात्र यामुळे आयते कोलीत मिळाले आहे. त्यावरून भाजपने सेना आणि काँग्रेस दोनीही पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

इंदिरा गांधी यांच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असं ज्यांना वाटतं, त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्य आहे. भाजपमध्ये घुसलेल्या इरसाल बाटग्यांची ही उठाठेव आहे, अशी जहरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काय म्हणलय नेमकं सामनाच्या अग्रलेखातून
भाजपला सध्या काही काम नसल्यानं ते अनेक विषयांचं उत्खनन करू लागले आहेत. भाजपमध्ये घुसलेल्या काही इरसाल बाटग्यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही.

इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार मधल्या काळात सरकारकडून झाले. आज भाजपला वाटते इंदिराजींचा अपमान झाला. त्यांना असं ‘वाटणं’ हाच इंदिराजींचा सन्मान आहे.

इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते असं काहीसं सुरू आहे.

मुसाफिरखान्यातील कार्यालयात करीम लालाचे जगभरातील नेत्यांसोबतचे फोटो होते. आज ते कार्यालय व दिवाणखाना नाही. त्यातील तसबिरी आजच्या भाजपवाल्यांनी पाहिल्या असत्या तर त्यांच्या डोळ्यांची बुबुळेच बाहेर पडली असती.

पंतप्रधान मोदी यांना ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूनं भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे.

सत्ता हातून सटकल्यानं निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्यामुळं जे झटके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/