आहार किती घ्यावा, याचा सल्ला जरूर घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – शरीरप्रकृतीनुसार सोसेल एवढाच आहार घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल, असा सल्ला तज्ज्ञ देतात. विशेष म्हणजे आहार किती आणि कसा घ्यावा, याबाबत आहारतज्ज्ञांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. दोन वेळा खाण्याचा सल्ला काहीजण देतात, तर काही थोड्याथोड्या वेळाने खावे, असे सांगतात. परंतु, आपल्या शरीर प्रकृतीस सोसेल एवढाच आहार घेणे कधीही चांगले.

शरीरप्रकृती ही वात, कफ, पित्त प्रवृत्तीने बनलेली असते. त्यामुळे शरीरप्रकृती जाणून आहार ठरवावा. कफप्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसातून दोनदाच खावे, तर ज्यांना कधी भूक लागते, कधी लागत नाही, अशा व्यक्तींनी दोन ते तीन वेळा खाण्यास हरकत नाही. दुधातून आंबा वगळता दुसरे कोणतेच फळ खाऊ नये. आहार नियंत्रण होत नाही, तोपर्यंत वजन कमी होणार नाही. आहारात कर्बोदके आणि प्रोटीनचा समावेश करावा. ज्या प्रदेशात राहता त्या पद्धतीचाच आहार घ्यावा. खात असलेल्या पदार्थांमध्ये किती कॅलरी आहेत, त्यांचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वडापाव, पोहे, उपमा यात ज्वारी आणि नाचणीपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्यामुळे भाकरी खाणे केव्हाही उत्तम असते. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांना जास्त प्राधान्य द्यावे. दररोज सायकल चालवावी. हा अतिशय चांगला व्यायाम आहे.

चूकीच्या आहारामुळे मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०३० मध्ये आठ कोटी लोकांना इन्सुलिनची गरज भासून इन्सुलिनचा तुटवडा जाणवू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. मधुमेहींचा हा आकडा कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ साखर न खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होत नाही. आम्लपदार्थ म्हणजेच सॉस, पाणीपुरी यामुळेही मधुमेह बळावतो. साखर किंवा गोड पदार्थ खात नाही, तरीही मधुमेह नियंत्रणात का राहत नाही, असे अनेकजण म्हणतात. परंतु, आहारात मीठ जास्त वापरले, तरी मधुमेह वाढतो. पनीर, चीज हे पदार्थही मधुमेही व्यक्तींनी टाळले पाहिजेत.