योगी आदित्यनाथ आणि मायावतीनंतर ‘या’ दोन नेत्यावर प्रचारबंदीची कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यानंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि आझम खान यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनेका गांधी ४८ तास तर आझम खान ७२ तासांची प्रचारबंदी करण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंगळवार (दि. १६ एप्रिल) सकाळी दहा वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना ७२ तास तर मायावती यांना ४८ तास प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे १२ एप्रिल रोजी पार पडलेल्या प्रचार सभेत मनेका गांधी यांनी मुस्लिमांना उद्देशून आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केले होते. मी जिंकणार तर आहेच. पण मुस्लिमांनी मला मत दिलं नाही आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले, तर स्वाभाविक आहे मी विचार करते, की यांना नोकरी देऊन काय उपयोग. असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. तसेच निवडणूक ही शेवटी सौदेबाजीच असते. आज मला तुमची गरज आहे उद्या तुम्हाला माझी गरज पडेल असे देखील त्या म्हणाल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. आझम खान यांनी यावेळी अर्वाच्च भाषेत जयाप्रदांवर टीका केली होती. चित्रपट अभिनेत्री आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्या विरोधात आक्षेपर्ह वक्तव्य केल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.