परप्रांतीयांबद्दल महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागच्या काही दिवसात राज्यातील जनतेला आवाहन करत आहेत. विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसेच आता त्यांनी खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. खासगी दवाखाने बंद राहत असल्यामुळे नियमित रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच त्यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रवासी प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल. राज्यांच्या सीमा बंद असून राज्यात अडकलेल्या नागरिकांची शासन काळजी घेईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोना व्यक्तिरिक्त इतरही आजारांसाठी लोकं त्यांच्याकडे येत असतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुली असतात. त्यांची गैरसोय होऊ नये. आणि आता लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देणार असून त्यात डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच ते म्हणाले की, मागच्या १५ दिवसात जिल्ह्यात परदेशातून जर कोणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी त्याबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील. औषधेही मिळतील हे पाहावे. तसेच शेतकरी आणि शेतीच्या कामासाठी ये-जा करणाऱ्यांना अडथळा होणार नाही, हे पाहावे.

तसेच इतर राज्यातून आपल्या राज्यात आलेल्या नागरिकांची आम्ही इथे काळजी घेऊ. त्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत परत पाठवणे शक्य नाही. तसेच महाराष्ट्रातील लोकं इतर कुठे अडकली असतील तर त्यांचीही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर जीवनावश्यक वस्तूंसाठी वापरणाऱ्या वाहनांना पोलीस अडवणार नाहीत, पण या वाहनांमध्ये संबंधित लोकांनी प्रवास करावा. संबंधित नसलेले दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या लढाईत आपण नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी. अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात आणि मुख्यालयाच्या संपर्कात राहावे. पोलिसांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी शांत डोक्याने काम करावे. तसेच राज्यात किराणा, भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवावे, या कल्पनेचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सांगत होते. दरम्यान उ.मुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही महत्वाच्या सूचना केल्या. या परिषदेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी हेही उपस्थित होते.