…म्हणूनच देवेंद्र फडणवीसांचा जळफळाट झाला

मुबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. असे म्हणत मुख्यमंत्री म्हणून ज्या चुका केल्या त्या निदान विरोधीपक्षनेता म्हणून करू नये असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने आपल्या सामान या मुखपत्रातून दिला आहे.

कोणाला विरोधीपक्षनेते करायचे आणि कोणाला नाही हा शेवटी भाजपचा प्रश्न आहे. परंतु राजस्थानात भाजपचे सरकार आले नाही, तर माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या काही विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. मध्यप्रदेशात देखील शिवराजसिंह चौहान यांचा पराभव झाल्याने त्यांनी विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे घेतले नाही. महाराष्ट्रात मात्र ‘फडणवीस एके फडणवीस’ अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढण्यात आला आहे.

मोदी सरकार विरोधात बंड करणारे पहिले नेते म्हणून सध्या नाना पटोले यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलून देत नाहीत म्हणून नाना पटोले बंड करत बाहेर पडले आणि विधानसभेत आले आणि विधानसभा अध्यक्ष झाले. त्यामुळे आता फडणवीस यांनी किती बोलायचे हे नाना पटोले ठरवणार आहेत. आम्ही नियमात चालतो त्यामुळे सरकार पाच वर्ष टिकले कारण हे सरकार कायदेशीर मार्गाने बनलेले आहे. असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये-

170 चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा 185 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे ‘कर्मफळ’ आहे.

भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाईल असे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारचे बहुमत काठावरचे नाही, तर चांगले दणदणीत आहे. सरकारच्या बाजूने 170 आमदारांचे बळ आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतोच, पण फडणवीस यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून आकडा 130 च्या वर जायला तयार नव्हता.

शनिवारचा ‘170’ आकडा बहुधा भाजपवाल्यांच्या डोळय़ांत व डोक्यांत घुसल्याचा परिणाम असा झाला की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांना माघार घ्यावी लागली. आता पुढील पाच वर्षे त्यांना अशा माघारीची सवय ठेवावी लागेल.

विश्वासदर्शक ठरावाच्या प्रसंगी नवीन विरोधी पक्षनेत्यांनी जे ‘नाटय़’ केले ते काही बरोबर नव्हते. मी नियम आणि कायद्याने वागणारा माणूस असल्याचे विनोदी विधान त्यांनी केले, पण त्यांनी विश्वासदर्शक ठरावादरम्यान जे मुद्दे उपस्थित केले, त्यास कोणत्या नियमांचा आधार होता?

छत्रपती शिवरायांचे नाव मंत्र्यांनी शपथविधीत घेतले म्हणून फडणवीस यांचा जळफळाट झाला. शिवरायांचे स्मरण बेकायदेशीर ठरवणारे नियमांची भाषा करतात व 105 बाके त्यावर बडवली जातात.

बहुमत नसताना महाराष्ट्राला अंधारात ठेवून बेकायदेशीर पद्धतीने शपथ घेणारे मुख्यमंत्री व विधानसभेला सामोरे न जाणारे 80 तासांचे मुख्यमंत्री अशी आपली इतिहासात आता नोंद झाली आहे हे लक्षात घ्या. ही नोंद पुसायची असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून कायद्याने काम करा किंवा निदान खडसे मास्तरांची पक्षांतर्गत शिकवणी लावा.

बहुमताच्या आसपासही जाता येणे शक्य नसताना दिल्लीने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली व ते सरकार कोसळल्यावर आता विरोधी पक्षनेतेपदीही पुन्हा फडणवीस यांनाच नेमले. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेला भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वातही बदल हवा होता व त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसले होते.

महाराष्ट्रावर जोरजबरदस्तीचे अघोरी प्रयोग चालले नाहीत. दिल्लीच्या जारण-मारण मंत्राचा प्रभाव पडला नाही. ‘बोलबच्चनगिरी’ सत्तेवर असताना लोकांनी खपवून घेतली. आता ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे भाजपाने पोसलेले मीडियावालेच बजावत आहेत.

विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’सारखा दिसतो. तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले. 170 चा आकडा पाहून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने विधानसभेतून पळ काढला.

Visit : Policenama.com