ठाकरे सरकारचा चीनला मोठा झटका, 5000 कोटींच्या 3 करारांना स्थगिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील महाविकास आघाडीने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या करारांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (दोन) या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या 5 हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या पुढे चिनी कंपन्यांशी कोणताही करार करु नये असा सल्ला दिला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

सोमवारी (15 जून रोजी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला चीनचे भारतीय दूत सन विडोंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर 3 हजार 770 कोटींचा करार झाला. या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगावमध्ये वाहननिर्मिती कारखाना उभारणार होती. महाराष्ट्र सरकार आणि चिनी कंपन्यांदरम्यान झालेल्या तीन करारांपैकी हा सर्वात मोठा करार होता.

त्याच प्रमाणे पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीच्या सोबतीने एक हजार कोटींचा कारखाना सुरु करण्यासंदर्भात करार केल्याचे सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. या करारामधून दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार होता.याचबरोबर हेन्गेली इंजिनियरिंगने राज्य सरकारबरोबर 250 कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता. तळेगाव येथील कंपनीचा दुसर्‍या टप्प्यात विस्तार करण्यासंदर्भाती या करारामधून 150 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. मात्र, भारत आणि चीन यांच्यातील संघर्षामुळे आता तीन करार स्थगित करण्यात आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.