‘…तर प्रत्येक प्रश्नावर उत्तरं सापडतील’, राज ठाकरेंची गांधीजींना आदरांजली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज जगभरातून अभिवादन केलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत महात्मा गांधी याना आदरांजली वाहिली आहे. प्रांजळपण आणि तटस्थपण हे गांधीजींच्या ठायी असलेले दोन गुण अंगिकारले तर आपल्याला अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

गांधी जयंती निमित्त राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नायक आणि काही प्रतिकांमध्येच अडकवलं जात आहे अशी खंत त्यांनी सुरुवातीलाच व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे कमालीचा प्रांजळपणा आणि तटस्थपणा होता. एखादी चूक किंवा अपराध मग तो परकीयांकडून घडलेला असो किंवा मग स्वकियांकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत. मात्र नेमकं हेच आज विसरलं जातंय असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

गांधीजींमध्ये अहंभाव नव्हता. माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा. कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे हे सांगण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त न होणं सुरू झालं आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

कोरोनाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरू आहे त्यात गांधीजींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं तरी प्रत्येक प्रश्नावर उत्तरं सापडतील असं म्हणत राज ठाकरेंनी गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.