नुसतं ‘पुन:श्च हरी ओम’ म्हणून चालणार नाही, मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंना कोपरखळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुसतं ‘पुन:श्च हरी ओम’ म्हणून चालणार नाही तर त्यासाठी सरकार म्हणून काही लोकहितार्थ निर्णय देखील तात्काळ घ्यायला हवे, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दिल्ली सरकारनं डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) जवळपास 9 रुपयांनी कमी करून लॉकडाऊनच्या काळात जनतेला दिलासा दिला. अगदी तशीच अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारकडून व्यक्त केली आहे. कोरोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीच अर्थव्यवस्था खालावली.

सरकारचा महसूल घटला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट 2 रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला देखील मनसेनं विरोध केला होता. पेट्रोल-डिझेलपेक्षा दारूवर कर वाढवा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केले आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महसूलात तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेलवर दोन रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढवला, सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार, असे नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यापूर्वी बाळा नांदगावकर यांनी सरकारवर टीका केली होती. दारू विक्रीला सरकारनं परवानगी दिली तेव्हा त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. देशातील अनेक राज्यात त्या त्या सरकारांनी दारुवर भरमसाठ कर लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल डिझेलवर नाही तर दारूवर कर वाढवा अशी मागणी केली होती.