मुंबईत ‘अभय’ योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ : आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बृहन्मुंबई महापालिकेने कोरोना परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेला मुदवाढ दिली आहे. अभय योजनेला 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आमदार सुनील प्रभू यांनी या संदर्भात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत आज 12 ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणीबिलाच्या थकबाकीवर दरमहा 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात होते.

अभय योजनेंतर्गत दोन टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत.