उपमुख्यमंत्री अजित पवारांचा केंद्रावर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे शोभतं का ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. शेतकरी अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करत असताना तुम्ही खिळे ठोकता ? ही पद्धत आहे का ? आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांग्लादेशमधून आलेत का ? असे सवाल करत पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले असताना त्यावेळी मत मांडायला कोणी रोखलं होतं ? परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात गैर काहीच नाही. माणुसकीला काळीमा फासणारी घटना जगात काही ठिकाणी घडत असेल तर त्यावर बोललं जातंच ना असा सवालीही त्यांनी केला आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षाअधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेच्या तब्बल 11 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. परंतु यानंतरही शेतकरी कृषी कायदे करण्याबाबत ठाम असून आता भारतीय किसान युनियन कडून 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय, राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. विविध रस्त्यांवर पोलीस, सुरक्षा दल यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यासोबतच रस्त्यावर खिळे देखील ठोकले आहेत. हा धागा पकडत अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपच्या वीजबिल आंदोलनावरून पवारांची टीका
विरोधकांकडून विनाकारण गैरसमज पसरवण्यचं काम सुरू आहे. आपण 50 टक्के वीजबिल माफ केलं. त्यावरील व्याज आणि दंड व्याजही माफ केलं. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वीजबिल आंदोलन करण्यात येत असल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली.