धक्कादायक ! तेलंगणामध्ये विहिरीतून काढले 9 प्रवासी मजुरांचे मृतदेह

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या वारंगलमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कारखान्याजवळील विहिरीतून कालपासून आतापर्यंत एकूण ९ मृतदेह सापडले आहेत. काल ज्या विहिरीतून चार मृतदेह सापडले, आज त्याच विहिरीत आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मरण पावलेले सर्व कामगार बंगाल आणि बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे. ज्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आहे त्यात मुले व महिलांचेही मृतदेह आहेत.

हे प्रकरण वारंगल ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे एका विहिरीतून ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गिसुगोंडा विभागातील गोर्तेकुंटा औद्योगिक क्षेत्रातील एका विहिरीमध्ये त्यांना प्रवासी कामगारांचे मृतदेह पडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह काढले. पोलिसांनी सांगितले की, माहितीनुसार सर्व मजूर तेथे एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करत होते. पोलिसांनी सांगितले की, नऊ मृतदेहांमध्ये एका मुलाचा आणि एका महिलेचाही मृतदेह समाविष्ट आहे. तपासात सात लोक पश्चिम बंगालमधील आणि दोन मजूर बिहारचे असल्याचे आढळले आहे. ते तेलंगणात पैसे कमावण्यासाठी आले होते. लॉकडाऊननंतर त्यांचे उत्पन्न थांबले होते. ते लोक चिंताग्रस्त होते. ते आपापल्या गावी जाणार होते, पण अचानक बेपत्ता झाले होते.

विहिरीतून पाणी काढल्यानंतर काढले गेले मृतदेह
पोलिसांनी सांगितले की, सर्व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी एमजीएम रुग्णालयात पाठवले असून गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. प्रवासी कामगारांशी संबंधित सर्वांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असून स्थानिक लोकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह काढण्यासाठी पंपाद्वारे प्रथम विहिरीतून पाणी काढले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढता येऊ शकले.