नामांतरावरून वाद ! ‘ते’ त्यांची मत मांडू शकतात, पण सरकारशी त्याचा संबंध नाही, राष्ट्रवादीची रोखठोक भूमिका

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शहरांच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद समोर येत आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसनेही याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे. औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेची(Shivsena)  भूमिका ठरलेली असून ती पूर्वीपासून आहे. शिवसेना दोन्ही शहरांचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असा करते, ते आम्हालाही माहीत आहे. मात्र या नामांतराबाबत काँग्रेसचीही एक भूमिका आहे. तिन्ही पक्षांच्या भूमिका आपापल्या ठिकाणी आहेत. कुणी कुठल्या नावाचा आग्रह धरावा हा त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांची मत मांडू शकतात. पण सरकारशी त्याचा संबंध नाही, असे सांगत ‘सरकार किमान समान कार्यक्रमावर बनल आहे याची आठवण करून देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यावरून काँग्रेसने शिवसेनेला सुनावल होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वैद्यकीय खात्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत CMO ने ट्विट करून म्हटले होते की, धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे, यात उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे. त्यामुळे राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या नावावरून महाविकास आघाडीत कुरघोडी होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते थोरात?
औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला ठणकावले होते. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे अशी तंबी दिली होती.