आजही नथुराम गोडसेची विचारधारा जिवंत : नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळी मारण्यात आली त्याच दिवशी जामियामध्ये अशी घटना होते याचा अर्थ नथुराम गोडसे याची विचारधारा जिवंत आहे आणि त्याला प्रोत्साहित करत आहेत ही दु:खद घटना आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. जामियामध्ये तरुणाने आंदोलकांवर केलेल्या गोळीबार प्रकरणावर नबाव मलिक यांनी माध्यमाशी बोलताना भाजपवर निशाणा साधला.

गुरुवारी जामियामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली यावरून नथुराम गोडसे याची मानसिकता जिवंत आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अनुराग ठाकुर यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील गद्दारांना गोळी मारा असं वक्तव्य केलं होते. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडत आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

मलिक यांनी पुढे म्हटले आहे की, काल जो तरुण पकडला गेला तो अल्पवयीन आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याला बंदूक कोणी दिली, त्याला प्रशिक्षण कोठे देण्यात आले आणि ज्या प्रकारे तो पिस्तुल फिरवत होता त्याअर्थी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या सर्व घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी यावेळी केली.