शेतकर्‍याची घोर चेष्टा ! नुकसान झालं 2.5 लाखाचं अन् सरकारनं चेक दिला 5 हजाराचा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गामुळे आधीच आर्थिक नुकसान झालेल्या
शेतकऱ्याचं निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यात ऐन पावसाळी हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अंदरसुल येथील एका शेतकऱ्याने सरकारने दिलेल्या मदतीचा निषेध केला आहे. तसेच या शेतकऱ्याने सरकारने दिलेल्या ५ हजारांच्या मदतीचा चेक परत केला आहे.

सरकारने गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये अंदरसुल या गावातील रहिवाशी असलेल्या गजानन देशमुख यांना सुद्धा मदत म्हणून चेक मिळाला. पण, चेक बघून ते आश्चर्यचकितच झाले. या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते सुमारे अडीच लाख रुपयांचे तर मदत म्हणून सरकारने ५ हजार रुपयांचा चेक त्यांच्या हाती ठेवला. ‘सरकारने मदत देऊन एका प्रकारे माझी चेष्टा केली, यापेक्षा जास्त खर्च तर मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावर झाला असेल’ असं संतप्त सवाल करत शेतकऱ्याने तहसीलदाराकडे चेक परत देऊन शासनाचा निषेध नोंदवला.

राज्यात ३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने इतर भागांसोबत येवल्यात सुद्धा धुमाकूळ घातला होता. यामध्ये अंदरसुल येथील गजानन देशमुख या शेतकऱ्याचे पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले होते. तेव्हा पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार यांनी या भागाची पाहणी करुन झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

देशमुख यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आला होता. परंतु, सरकारकडून मदत म्हणून फक्त ५ हजार रुपयांचा चेक देण्यात आल्यामुळे देशमुख चांगलेच संतापले. येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ही परिस्थिती असेल तर मग कोकणातील नुकसानग्रस्तांच काय होईल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.