ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना टोल माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, राज्य सरकारने गणेशोत्सवासानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षी प्रमाणे टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव सुरु होण्याच्या दोन आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे शिंदे यांनी सांगितले.

कोरोना पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोना चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.