सव्वाशे कोटी जनता पाठीशी ; पाकिस्तानला घाबरत नाही

कलबुर्गी : वृत्तसंस्था – देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची ताकद माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे मी विरोधकांना तसेच पाकिस्तानलाही घाबरत नाही. जोपर्यंत केंद्रात मोदी असेल, तोपर्यंत चोरांचं दुकान बंदच राहील असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की , ‘मी दहशतवाद निपटून काढण्यासाठी प्रयत्न करतोय आणि देशातील सर्व विरोधक एकट्या मोदीला हटवण्यासाठी धडपडत आहेत. मला भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे. पण त्यांना भ्रष्टाचार हवा आहे. केंद्रात सध्या मजबूत सरकार आहे. पण त्यांना मजबूर आणि लाचार सरकार हवं आहे. मी ते होऊ देणार नाही. महागठबंधन ही महामिलावट आहे. जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहीन, असं आश्वासन मोदींनी यावेळी दिल.

शेतकरी सन्मान योजना लागू करण्यासाठी कर्नाटक सरकारचे सहकार्य नाही-

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की , ‘कर्नाटकात सध्या ‘मजबूर’ सरकार आहे. सत्तेतले लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत. प्रत्येक जण एकमेकांचे पाय ओढण्यात दंग आहे. एका चुकीमुळं हे सगळं झालं आहे. ही चूक सुधारण्याची संधी पुन्हा आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यासाठीही इथले सरकार सहकार्य करत नसल्याचे ते म्हणाले.तुमच्या हितासाठी काम करेल असं सरकार आता आणा,’ असं आवाहन त्यांनी केलं. देशाला मजबूत सरकारची गरज असल्याचेही ते म्हणाले.