शेवग्याच्या शेंगा महाग तर भाज्या, तूरडाळीचे भाव घसरले

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   बाजारात आवक वाढू लागल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झाले असले, तरी शेवग्याच्या शेंगा महागच आहेत. भेंडी शंभरीच्या उंबरठ्यावर होती ती आता कमी झाली आहे. मात्र, तेलाची आवक कमी झाल्याने त्याचे दर मात्र वाढत आहेत. दुसरीकडे तूरडाळ स्वस्त झाली असून, फळांमध्ये केळी महाग तर सफरचंद स्वस्त झाले आहेत. दर कमी होत असल्याने सामान्यांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.

आवक कमी होत असल्याने तेलाचे दर वाढत चालले आहेत. त्याचा घरच्या बजेटवर परिणाम झाला आहे. सध्या १० रुपयांनी तेलाचे दर वाढत असल्याचे किराणा मालाचे विक्रेते मयूर तन्ना यांनी सांगितले, तर तूरडाळ २० रुपयांनी स्वस्त झाला आहे. पपई, सफरचंद, डाळिंब, केळीच्या भावात चढउतार असल्याचे फळविक्रेते शिवकुमार वर्मा यांनी सांगितले. भाज्या स्वस्त झाल्या आहेत. फळभाज्यांकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे भाजीविक्रेते रवी कुर्डेकर यांनी सांगितले.
ग्राहकांचा कल भाज्यांकडे

यावर्षी शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात शेवग्याचे पीक घेतले आहे, त्यामुळे त्याची आवक कमी झाली. आपसूकच त्याचा परिणाम शेवग्याच्या दरावर झाला आहे. फ्लॉवर, कोबी, मटार, फरसबीचे भाव वाढले होते. मात्र, आता त्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांचा कल या भाज्यांकडे अधिक आहे. भाजीविक्रेते रवी कुर्डेकर यांनी सांगितले.

तेलाच्या दराने खिशाला कात्री

एकीकडे भाज्यांच्या दरात घसरण झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, तेलाच्या वाढत्या दराने खिशाला कात्री लावली आहे, असे विद्या जाधव या गृहिणींनी सांगितले.