तक्रार दिल्यानं टोळक्यांकडून वाहनांची ‘तोडफोड’ अन् परिसरात प्रचंड ‘दहशत’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून चौघांनी नाना पेठेत हातात लोखंडी कोयते तसेच हातात बांबू घेऊन प्रचंड दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी मुनाफ खान (वय 37, रा. 1009, न्यु नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मित्र सचिन याने फिरोजी नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरून फिरोज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चौघेजन दुचाकीवरून हातात कोयते तसेच लाकडी बांबू घेऊन परिसरात आले. त्यांनी काचेच्या बाटल्या फेकून तसेच तुफान गोंधळ घालत परिसरात दहशत माजवली. तसेच, पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोडकरून नुकसान केले. त्यानंतर सचिन यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जमा झालेल्या दोन तरुणांना धमक्या देऊन निघून गेले. अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होती. याची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.