राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व करावे : सचिन पायलट

पोलिसनामा ऑनलाईन – राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व करावे अशी मागणी राजस्थानचे उप-मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या तरुण चेहर्‍यांपैकी एक अशी ओळख असलेल्या सचिन पालयट यांनी केली आहे. जयपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यामध्ये गलवान खोर्‍यात होत असलेल्या संघर्षावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारला कात्रीत पकडले होते. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा एकदा हे पद सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत राहुल गांधी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकार अपयशी पडत असल्याचे सांगत आहेत. याव्यतिरीक्त सोशल मीडियातूनही राहुल गांधी भाजपा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी केलेल्या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पायलट यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वारंवार वाढ होत आहे. लोकांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. यावर केंद्राने काहीतरी पावले उचलून भाववाढ रोखावी अशी मागणी केली आहे. नाहीतर 29 जूनपासून काँग्रेस पक्ष याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.