SSR Death Case : मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, थेट PM मोदींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता भाजपने पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परमबिर सिंह यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची भुमिका तसेच मुंबई शहारचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही भुमिका हलगर्जीपणाची राहिली असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता.

मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि अपघाती मृत्यू अशी नोंद केली, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. कलम 311 (2) (ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असं भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवण्यात आली आहे.

माफी मागत कारवाईची मागणी

देशाच्या आर्थिक राजधानीतील जनहिताचं प्रकरण असल्यामुळे आपली माफी मागत हस्तक्षेप करत असल्याचे म्हणत त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत या तपासात कोणतीही प्रगती केली नव्हती, असं म्हणत भातखळकर यांनी पत्रात कारवाईसाठीची विविध करणंही लिहिली आहेत.

मुंबई पोलिसांच्या चौकशीवर कोर्टाची नाराजी

सुप्रीम कोर्टाने उपलब्ध माहितीच्या आधारावर चौकशीची परवानगी दिली. पण मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नाही आणि त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. अनेक बाबी समोर येऊनही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही, असं भातखळकर यांनी पत्रात नमूद केलं आहे.

पोलीस आयुक्त कोणालातरी क्लीनचिट देत आहेत

पोलिसांकडून माध्यमांसमोर मृताची खासगी माहिती सार्वजनिक करण्यात आली, जो कोर्टाच्या नियमांचा अवमान आहे. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वॉरंटाइन करण्यात आलं. त्यामुळे परमबिर सिंह हे कुणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट होतं. या प्रकरणाचे तपास अधिकारी त्रिमुखे यांचं वर्तनही संशयास्पद असून ते रिया चक्रवर्तीच्या संपर्कात होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.