सरकार पास झालंय, पण… मुख्यमंत्र्यांच्या कामावर शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने कारभार हाती घेऊन सहा महिन्यापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. सरकार सध्या कोरोनाशी मुकाबला करत असून, सरकारच्या कामाबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी आपली भूमिका मांडली.

संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केला. राज्यातील राजकारण सहा महिन्यांपूर्वी आपण बदलून टाकले आहे. सहा महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा अन् मग प्रगतीपुस्तक येते पालकांकडे. तसे सहा महिन्यांचे प्रगतीपुस्तक पालक म्हणून आपल्याकडे आलेय का?, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. यावर पवार म्हणाले, ही जी परीक्षा आता झाली, ती संपूर्ण परीक्षा झाली मला वाटत नाही.

त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. ही लेखी झाली आहे. लेखीमधील निकालावरून प्रॅक्टिकलमध्येही ते यशस्वी होतील, असे आता दिसत आहे. त्यामुळे त्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणे योग्य नाही. राज्याच्या विचाराच्यादृष्टीने सहा महिन्यात येत्या परीक्षेत विद्यार्थी पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा, पुढचे पेपर सहजपणाने पूर्ण करेल, असे पवार म्हणाले. आपण हे मुख्यमंत्र्यांविषयी सांगत आहात, असा प्रश्न राऊत यांनी मध्येच विचारला. त्यावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते, असे उत्तर दिले.