अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यावर ठाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अद्यापही ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी जालन्यात दानवे आणि खोतकरांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचे मानले जात होते. मात्र, खोतकरांनी आपला ताठरपणा कायम ठेवला आहे. काल मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांची समजूत घालता आली नाही. आपण तयारीमध्ये खूप पुढे गेलो आहोत. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीबाबत विचार व्हावा अशी गळ त्यांनी घातली आहे. उद्या संध्याकाळी मातोश्रीर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत खोतकरांना निर्णय होण्याची शक्यता आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता दिसत नाही. सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टाई केली मात्र, खोतकर अजुनही नाराज आहेत. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगितले. परंतु दानवे आणि खोतकर हे आपआपल्या विधानावर ठाम आहेत. खोतकर हे लोकसभा निवडणुकीची तयारी केली असून मी खूप पुढे गेलो आहे, असे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे म्हटले आहे.

जालन्याच्या जागेचा वाद दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या जालन्याचे खासदार आहेत. मात्र शिवसेना नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या जागेवर दावा केला. दानवे आणि खोतकर यांच्यामधून विस्तवही जात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केल्यापासूनच खोतकर यांनी दानवेंविरोधात दंड थोपटले आहेत. आता युती झाली असली, तरी खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे जालन्याच्या जागेवरुन दोन्ही पक्षात पेच निर्माण झाला नाही. जालन्यासोबतच आणखीही काही मतदारसंघांमध्ये कुरबुरी सुरू आहेत.