शिवसेना आमदाराचा अमृता फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या – ‘हा प्रश्न देवेंद्रजींना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) सरकार आणि भाजपमध्ये ( BJP) विविध मुद्द्यांवरून धुसपूस सुरू आहे. सध्या या दोघांमध्ये मेट्रो कारशेड ( Metro Karshed) मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. त्यानंतर हे कारशेड कांजूरमार्गला ( Kanjurmarg) बांधण्याचा निर्णय घेतला. पण यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जागेवरून संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतर अल्प बुद्धी, बहु गर्वी असल्याचं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला होता.

त्यानंतर आता शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार यामिनी जाधव यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावत हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरं झालं असतं. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी ‘अल्प बुद्धी’ दिसतेच आहे,” असं म्हणत यामिनी जाधव यांनी ट्विटरवरून फडणवीस यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या फडणवीस?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया देत अल्प बुद्धी, बहु गर्वी… कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल विचारला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणावरून वाकयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान याआधी भाजप आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टीका करत मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे, असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते.

त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल, तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप शेलार यांनी केले होते.