‘आम्ही व्यापारी नाही, आम्ही शब्दाला जागतो’, शिवसेनेचं HM शहांना ‘प्रत्युत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. राजकारणात किमान नैतिकतेची अपेक्षा आहे. सुरू असलेली नैतिकता नाही. अमित शहा लोकसभा निवडणुका होईपर्यंत का बोलले नाहीत की, समसमान सत्तावाटपाचं काहीच ठरलं नाही. आम्ही व्यापारी नाही. आम्ही शब्दाला जागतो असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शहांनी अडीच वर्षांचा शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल या शिवसेनेच्या मागणीवर बोलताना म्हटलं होतं की, “निवडणूक काळात आम्ही वारंवार सांगत होतो की, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील तेव्हा शिवसेना का बोलली नाही ?” असा सवाल शहांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषद घेत राऊतांनी शहांवर पलटवार केला आहे. इतकेच नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी निर्माण करत आहेत असा आरोपही राऊतांनी शहांवर केला.

संजय राऊत म्हणाले, “आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही असत्याचा आधार घेऊन राजकारण केलं नाही. बाळासाहेबांच्या खोलीत सत्तावाटपाच्या गोष्टी ठरल्या होत्या. शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही. बंददाराआड काय चर्चा झाली हे मोदी-शहांनी सांगितलं नाही. बंद दाराआड दिलेली आश्वासनं जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा ती उघड होतात. आम्ही पंतप्रधानांचा नेहमीच आदर केला आणि करत राहणार. बंद दाराआडच्या फॉर्म्युल्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत.” असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाला घेऊन भाजप आणि सेनेत फूट पडली. यानंतर अमित शहांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलं. शहा म्हणाले होते की, “अडीच वर्ष देण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता.” असे म्हणत त्यांनी शिवसेनेला संख्याबळ जास्त असेल तर खुशाल सत्ता स्थापन करा असं ओपन चॅलेंजही दिलं.

Visit : Policenama.com