मुंबईत तरारलेली कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकतेय : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणापासून कंगना सातत्याने बॉलिवूडमधील काही कलाकारांवर टीका करत आहे. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला होता. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. कंगनाने केलेल्या विधानांचा समाचार घेत शिवसेनेने टीकास्त्र डागले आहे. यावर सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे.

देशात विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचा अपमान करणार्‍या उपर्‍या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही. राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणार्‍या त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणार्‍यांचीच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अग्रलेखातून केली आहे.