…तर ब्राह्मण बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो, खडसेंचा यू-टर्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Ncp leader Eknath Khadse) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असे म्हटले आहे. आता, खडसेंनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहाेचली असेल तर मी दिलगिरी (so-i-apologize-brothers-brahmin-community) व्यक्त करतो, असे खडसे यांनी म्हटले आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावे; अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असेही दवेनी म्हटले आहे. यासंदर्भात दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदन दिले आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटते, असेही दवे यांनी म्हटले आहे.

ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. मी सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहाेचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते खडसे?
हा नाथाभाऊ मोठा दिलदार माणूस आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे मला सांगितले गेले. त्यावर मी म्हटले की, मी भल्याभल्यांना दान देतो; मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकले गेले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचे वाटोळे झाले आहे, अशा लोकांमुळेच मला भाजप सोडावा लागला, असे खडसे म्हणाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून खडसे हे फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत. मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केले, एकनिष्ठ राहिलो. मात्र मला एका माणसाने छळले असा आरोप त्यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.