धक्कादायक ! सोयाबीन उगवलं नाही, तरूण शेतकर्‍यानं केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सोयाबीन न उगवल्याने हताश झालेल्या एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. संतोष गायकवाड (वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावात ही घटना घडली आहे.

संतोष यांच्यावर बँकेचे आणि सोसायटीचे कर्ज होते. सतत नापिकी आणि त्यातच सोयाबीनची पेरणी करुनही पिकं न आल्यामुळे ते हवालदील झाले होते. कर्ज कसे फेडावे अशी चिंता संतोष यांना लागली होती. तशी व्यथा त्यांनी बोलूनही दाखवली होती.

त्यातच मुलांच्या भविष्याबद्दलही चिंता व्यक्त करीत त्यांनी काल शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिरढोन पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.