‘खा. संजय राऊत यांना तुरुंगात टाका’, भाजपचे केंद्रीय मंत्री संतापले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या कुटुंबियांवर टीका केल्यानंतर बिहारमधील अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे बिहारमधील काही नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपाचे नेता आणि केंद्रीय राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राऊत यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

राऊत यांनी केवळ सुशांतच्या वडिलांचा अपमान केलेला नाही तर संपूर्ण बिहारचा अपमान केला आहे. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांची माफी मागायला हवी. राऊत यांच्याविरोधात पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात गुन्हा दाखल करुन काही होणार नाही राउत यांना तुरुंगात टाकले पाहिजे, असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चौबे यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल का केली नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. बिहार पोलिसांनाही तपास करण्यापासून थांबवण्यात आल्याचं सांगत आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.