‘सुशांतसाठी लोक लढले, मग मला न्याय का नाही ?’, नाना पाटेकरांच्या वापसीवरून तनुश्री दत्तानं व्यक्त केला संताप !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फेमस बॉलिवूड स्टार नाना पाटेकर (Nana Patekar) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अशी चर्चा आहे की, नाना आता फिरोज नाडियाडवाला (Firoz A. Nadiadwala) यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिनं मात्र त्यांच्या वापसीवरून संताप व्यक्त केला आहे. नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात असा सवाल तिनं केला आहे.

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. हॉर्न ओके प्लीज (Horn Ok Please) या सिनेमाच्या सेटवर नानांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं असा आरोप तिनं केला होता. आता याच प्रकरणाचा पुन्हा एकदा उल्लेख करत तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ती बोलत होती.

तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला आहे. त्यांच्यामुळं माझं फिल्मी करिअर संपलं. काही दिवस मी नैराश्येत देखील होते. स्त्रियांचा अनादर करणाऱ्या त्या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये काम देऊ नये. निर्मात्यांनीही त्यांना पाठींबा देऊ नये.” असंही ती म्हणाली.

पुढं बोलताना तनुश्री म्हणाली, “देशातील लोक सुशांतला (Sushant Singh Rajput) न्याय मिळावा यासाठी प्रशासन व्यवस्थेशी लढले. परंतु मला मात्र कोणाचाही पाठींबा मिळाला नाही” अशी टीकाही तिनं केली आहे.