ट्रकखाली चिरडल्याने दोघांचा मृत्यू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – उसाच्या ट्रकने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डाक बंगल्याजवळ आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
बाबासाहेब बाजीराव ससे, रवींद्र तुकाराम दांगट (दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) ही मयतांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ससे व दांगट हे दोघे वांबोरी येथून दुचाकीवरून चालले होते. रात्रीच्या वेळी भरधाव वेगातील उसाच्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. त्याने दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला.

या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. मयताच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.