दुर्दैवी ! पंजाबहून बिहारला पायी जाणार्‍या 6 मजूरांना बसनं चिरडलं

मुजफ्फरनगर : वृत्त संस्था  – पंजाबहून बिहारमधील आपल्या गावी पायी जाणार्‍या मजूरांना एका बसने चिरडले. त्यात ६ जणांचा मृत्यु झाला आहे. मुजफ्फरपूर -सहारनपूर या महामार्गावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यु झाला असून ४ जण जखमी आहेत.

 

हे सर्व कामगार बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील राहणारे आहेत. लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने हे सर्व कामगार पंजाबहून रात्री उशिरा सहारनपूर मार्गे मुझफ्फरपूरकडे पायी जात होते. घलौली चेकपोस्टपासून काही अंतरावर असलेल्या रोहाना टोल प्लाझाजवळ भरधाव आलेल्या बसने या कामगांराना चिरडले. त्यात ६ जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी असलेल्या ४ जणांवर मेरठ मेडिकल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेऊन बसचालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.