अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कोकणातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली तीन महिने सातत्याने झोडपून काढणाऱ्या मॉन्सूनने राज्यात वारंवार महापूराची परिस्थिती आणली आहे. हवामान विभागाने गुरुवार, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकणातील जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाने गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
उत्तर गुजरातपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणावर ढगांची दाटी झाल्याचे रडारवरील छायाचित्रांमुळे दिसून येत आहे. मुंबई व परिसरात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.

Visit – policenama.com