पुढील 3 दिवस पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा ! गारांसह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसनं हजेरी लावली आहे. अशात आता पुण्यानंतर विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आणखी 3 दिवस गारपीठ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागात चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यानं पुढील काही दिवस पाऊस होणार आहे. यामुळं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यावरच पावसाचं संकट आहे. काल गोंदिया, यावतमाळ, अकोला, जिल्ह्यात गारपिठीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

पुण्यातही पावसाचा इशारा
पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे शहर आणि परिसरात वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळं पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरूल गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्या भागात कधी पाऊस ?
मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात 18 तारखेला वादळी पावसाचा अंदाज आहे. काही प्रमाणात गारपिठीची शक्यता नाकारत येणार नाही. मात्र 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिठीची तीव्रता तसंच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहिल. परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं
शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं, तसंच वादळ आल्यास लोकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.