पत्नीकडून पतीचा गळा चिरुन खून, आत्महत्येचा बनाव उघडकीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीचा गळा चिरुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने आत्महत्या करण्याचा बनाव केला. मात्र, तासगाव पोलिसांनी तीच्या आत्महत्येचा बनाव उघडकीस आणून अटक केली. सांगली जिल्ह्यातील तासगावमधील इंदिरानगरमध्ये हा प्रकार घडला आहे.

कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (वय-४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्लापा याला क्षयरोग होता, तसेच कल्लापा त्याची पत्नी शांताबाई बागडी हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे शांताबाईने रागाच्या भरात हा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

मागील काही वर्षापासून कल्लू बागडी हा क्षयरोगाने त्रस्त होता. त्यातून त्याची सतत चिडचिड होत होती. तो पत्नी शांताबाईच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पतीचे आजारपण आणि त्याची संशयी वृत्तीमुळे पत्नी वैतागली होती. बुधवारी रात्री त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. यावेळी “मी आत्महत्या करतो”, असे सांगून घरातील चाकू सारखे धारदार शस्त्र घेऊन कल्लू घरातून बाहेर पडला. घराच्या मागे असणार्‍या खोलीत गेला. त्यावेळी शांताबाईही त्याठिकाणी आली. कल्लूने चाकू गळ्याला लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यावेळी शांताबाईने “तू कशाला मरतो, मीच तुला मारते”, असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकू लागला आणि कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला. यामध्ये कल्लूचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याचा कांगावा केला. त्यानंतर काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडला असल्याचे दिसून आल्याचे नाटक केले. शांताबाई स्वतः पोलिसांत जाऊन नवर्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. ज्यामध्ये घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना खुनाची शंका आल्याने शांताबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आपणच खून केल्याचे शांताबाई बागडी हिने कबूल केल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितले.